सुजाण मुस्लिम नेत्यांनी मूलतत्त्ववाद्यांना विरोध करावा: भागवत

नवी दिल्ली: हिंदू आणि मुस्लिम यांचा वारसा समान आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिक ‘हिंदू’च आहे, असा दावा सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख अर्थात सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. पुणेस्थित ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाउंडेशनने आयोजित केलेल्या एका समारंभात भागवत म्हणाले, “सुजाण” मुस्लिम नागरिकांनी मूलतत्त्ववाद्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे. “हिंदू हा शब्द मातृभूमीशी, आपल्या […] The post सुजाण मुस्लिम नेत्यांनी मूलतत्त्ववाद्यांना विरोध करावा: भागवत appeared first on द वायर मराठी.

नवी दिल्ली: हिंदू आणि मुस्लिम यांचा वारसा समान आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिक ‘हिंदू’च आहे, असा दावा सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख अर्थात सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे.

पुणेस्थित ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाउंडेशनने आयोजित केलेल्या एका समारंभात भागवत म्हणाले, “सुजाण” मुस्लिम नागरिकांनी मूलतत्त्ववाद्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे.

“हिंदू हा शब्द मातृभूमीशी, आपल्या पूर्वजांशी आणि भारतीय संस्कृतीशी समतुल्य आहे. हे अन्य श्रद्धांचा निरादर करणे नाही. आपण भारताला वर्चस्वाचे स्थान मिळावे म्हणून विचार केला पाहिजे, मुस्लिम वर्चस्वासाठी नाही,” अशी पुस्तीही भागवत यांनी जोडली.

भारताच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने एकत्र येऊन काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

“इस्लाम भारतात आला तो हल्लेखोरांच्या सोबतीनेच. हाच इतिहास आहे आणि तो याच पद्धतीने सांगितला गेला पाहिजे. विनाकारण वाद उभे करण्यास सुजाण मुस्लिमांनी विरोध केला पाहिजे आणि मूलतत्त्ववादी तसेच कडव्या मुस्लिमांच्या विरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे. हे आपण जेवढे लवकर करू, तेवढी समाजाची हानी कमी होईल,” असे मतही भागवत यांनी व्यक्त केले. भारत एक महासत्ता असून, कोणालाही घाबरणार नाही, असेही ते म्हणाले.

“हिंदू हा शब्द आपल्या मातृभूमीच्या, पूर्वजांच्या व संस्कृतीच्या समृद्ध वारशाशी समतुल्य आहे आणि प्रत्येक भारतीय हिंदूच आहे,” असा दावा भागवत यांनी केला. ते “नेशन फर्स्ट, नेशन सुप्रीम” नावाच्या एका चर्चासत्रात बोलत होते.

हिंदू आणि मुस्लिमांचा वारसा समान आहे, असे मत भागवत यांनी व्यक्त केले.

अर्थात इस्लामी कट्टरतावाद्यांवर टीकेची झोड उठवताना भागवत यांनी भारतातील उजव्या विचारसणीच्या हिंदू कट्टरपंथीयांचा विषयही काढला नाही. अनेक हिंदू कट्टरपंथीय समूहांवर हत्यांचे आरोप होऊनही त्यांनी या विषयाला बगल दिली. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्जी यांच्यासारखे विचारवंत, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यांचे आरोप हिंदू कट्टरपंथीय संघटनांवर होत असूनही भागवत यांनी त्याबद्दल बोलणे टाळले. संघ परिवाराच्या छत्रछायेखाली फोफावलेल्या छोट्या हिंदुत्ववादी गटांवरही अल्पसंख्याकांचा छळ केल्याचे आरोप अलीकडील काळात अनेकदा झाले आहेत.

आरएसएस तालीबानहून फारसे वेगळे नाही असे म्हणून लेखक व गीतकार जावेद अख्तर यांनी नुकतेच एका वादाला तोंड फोडले आहे. “आरएसएस आणि बजरंग दलासारख्या संघटनांना पाठिंबा देणाऱ्यांनी थोडे आत्मपरीक्षण करावे. ते तालीबानहून वेगळे कसे,” असा प्रश्न अख्तर यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान उपस्थित केला होता.

त्यानंतर भाजप व शिवसेना यांसारख्या पक्षांच्या नेत्यांनी अख्तर यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. हिंदू संस्कृतीचा अनादर केल्यामुळे त्यांच्यावर बहिष्कार टाकावा अशी मागणी या नेत्यांनी केली होती.

The post सुजाण मुस्लिम नेत्यांनी मूलतत्त्ववाद्यांना विरोध करावा: भागवत appeared first on द वायर मराठी.